सावली – अध्याय २

।। श्री ।।
।। अथ द्वितीयोऽध्याय: ।।

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।। ऐशा या मालुस्ते गांवांत । दुर्गा वाढे बालपणांत । हळूहळू येई यौवनांत ।चिंता उद्भवली अजोबांना ।। १ ।। परिस्थिती केवळ गरिबीची । अठराविश्वे दारिद्र्याची । चिंता संपता आजची । उद्यांची उद्भवे त्वरित ।। २ ।। कष्ट करिती अपार । तेव्हां कोठे दिसे भाकर । अथवा चणे-मुरमुर्यांवर । दिन काढावे कधीं कधीं ।। ३ ।। जिणे नित्याचे रोजीवर । लाकूडतोड्याचे धंद्यावर । कित्येक दिवस उपवासावर । दैवाचे भरंवशावर काढीती ।। ४ ।।धुणी-भांडी घासोनी । पाणी भरी कोसावरुनी । कांटे पायांत मोडुनी । दुर्गा कष्टतसे घरांत ।। ५ ।। लाज राखण्यापुरतें । एकच वस्त्र अंगाभोवतें ।एकही इच्छेची न होती पूर्ती । केवळ दारिद्र्यामुळें ।। ६ ।। ऐंसी असता परिस्थिती । लग्नानें उपजे भीती । कोणा भाग्यवंता हाती । दुर्गा द्यावी कळेना ।। ७ ।। आजोबांचे येई ध्यानांत । कीं दुर्गा आहे भाग्यवंत । तिचे अनुभव घेता लक्षांत । कंठ दाटें तयांचा ।। ८ ।। डोळां आणोनिया पाणी । म्हणें देवा काय तुझी करणी । माझे सौभाग्य म्हणूनी । हिरकणी दिलीस पोसाया ।। ९ ।। दुर्गेला होत्या बंधु-भगिनी । त्याही नेल्या आप्तांनी । आई नव्हती म्हणूनी । ऐसी पांगली भावंडे ।। १० ।। काय आहे तुझ्या मनांत । की दुर्गेनें जगावे दारिद्र्यात । मुलांची केली वाताहात । काय केंलेस देवां तूं ? ।। ११ ।। ऐसें गहिंवरता त्यांचे मन । तोंच दुर्गेचें स्मरलें संभाषण । मी देवींच्या संगे राहून । बहुत दिन खेळलें ।। १२ ।।खूप खूप होतें आनंदात । वाटे न जावें कधींही परत । स्वर्ग सुखाच्या सौख्यांत । रममाण व्हावें सदैव ।। १३ ।। ओठी लावलें अमृताचें बोट । आणि येथे चाटते शुष्क ओठ । तुझी कैसी करणी अघटित । निष्ठुर माया कळेना ।। १४ ।। संत सखु आणि बहिणा । संत मुक्ता आणि जना ।दारिद्र्याच्या भोगती यातना । मग दुर्गेचा काय पाड ? ।। १५ ।। ऐसा करित असतां विचार । आजोबांना दिसे एक वर । जरी होता मोठा बिजवर । वाटे मुक्त व्हावे कन्यादानें ।। १६ ।। नाडसुरचे सुळे-देशमुख । शांताराम नांवे कुटुंबात । स्वयें मागणी असे घालीत । दुर्गेला द्यावी म्हणोनियां ।। १७ ।। ऐसी संधी येता चालत । कार्यही करिती त्वरीत । आणि गंगासिंधूला मिळत । चंद्र-सूर्याच्या साक्षीनें ।। १८ ।। दुर्गेची जानकी जाहली । कळी संसारी झेपावली उमलोनी प्रसन्न फुलली । संसार नेटका करावया ।। १९ ।। शांताराम होते पति । परी स्वभावांत नव्हती शांती । होती कोपिष्ट प्रवृत्ती । जमदग्नी वाटती दुजे कीं ।। २० ।। वरी दुर्गा होती शांत । तिला कळलें कीं वृत्त । पहिल्या पत्नीसी त्यजित पतिदेव आपुले ।। २१ ।। विरहाचें दु:ख जाणून । सवतीला आणावें म्हणून । पतिदेवास घाली आण । वारंवार पायाशीं ।। २२ ।। परी कधी ते न ऐकत । वरी अधिकची ते कोपित । जानकी मात्र शांत । सोशीतसे सर्व तें ।। २३ ।। वरी गरिबी होती संसारी । त्यांत पतीस नव्हती नोकरी । चिंता जाळीतसे उरीं । वाढत्या संसाराची ।। २४ ।। महाराष्ट्र सोडूनी निघती । गुजराथेंत येऊनी पाहती । ‘गणदेवीस’ येऊनी राहती । कौल दैवाचा घ्यावया ।। २५ ।। येथें दैवानें दिली साथ । कामधंदाही लाभत । परि तलाठीचे नोकरींत । जम बैसलासे थोडासा ।। २६ ।। परि जे काहीं होतें मिळत । त्यांत संसारही नव्हता भागत । कारण आप्त होते बहुत । अवलंबून त्यांचेवरी ।। २७ ।। वाटे दारिद्र्याने केली संगत । जानकीच्या याही संसारात । उपवास काढती बहुत । चित्तीं समाधान ठेऊनियां ।। २८ ।। दादा मात्र वैतागती । परि जानकीची न ढळें शांती । माया-ममता-प्रीती । स्वजनांवरी करितसे ।। २९ ।। तिच्या कष्टास नव्हती क्षीती । पाण्यास जावें नदीवरती । कोसावरून येता टरटरती । पाय कोवळ्या जानकीचे ।। ३० ।। कित्येक वर्षांपर्यंत । एकच लुगडे होत्या नेसत । अर्धे धुवूनियां घालत । अंगावरीच आपुल्या ।। ३१ ।। जाऊनी शिंप्याचे दुकानांत । चिंध्या गोळा असती करीत । ठिगळांची करूनियां घालित । चोळी अंगावरी आपुल्या ।। ३२ ।। जानकी जें जगली जीवन । तें कारुण्याचें दारुणपण । ऐकता द्रवेल पाषाण । शब्द थिटे वर्णावया ।। ३३ ।। जानकीची नणंद निवर्तली । तिचीं मुलें येथेच आणिली । वरी जानकी जाहली लेकुरवाळी । नांदे गोकुळ संसारी ।। ३४ ।। अपार कष्टाने संसारी । जानकी पडतसे आजारी । दादा संतापती वरचेवरी । परी उपाय काय कळेना । ।। ३५ ।। जानकी खिळली अंथरुणावर । हटे न देहांतून ज्वर । आतां मात्र देवावर । सर्व भरंवसा टाकीती ।। ३६ ।। जानकीचे कळता वृत्त । चंपूमावशी येती धांवत । तिज पाहतां बोलत । उठ उठ चंपावती ।। ३७ ।। अरे हिला न कोणता आजार । देहीं चंपावतीचा संचार । सुखें कराया व्यवहार । मोकळ्या मनाने संसारी ।। ३८ ।। जानकी उठून बैसली । आनंदाने बहुत घुमली । ओळख ऐसी पटली । हर्ष झाला म्हणोनियां । । ३९ ।। मात्र या दिवसानंतर । चक्रें दैवाची फिरत । आणि अभ्युदयाकडे वळत । हळू हळू ती कुटुंबांची ।। ४० ।। आता दादांचाही चांगला । वाहन दलाली धंदा जमला । शेतीचा तुकडाही घेतला । संसार चाले नेटका ।। ४१ ।। घरात नांदे गोकुळ । घरीं पाहुण्यांची वाढें वर्दळ । माया दाखवी आपुला खेळ । लाज राखे संसाराची ।। ४२ ।। कधी येता मित्र-परिवार । पीठही नसतां चिमूटभर । कैसी द्यावी भाकर । प्रश्न पडे मुलींना ।। ४३ ।। कोंडा घेऊनि चाळणींत । जानकी बसे मुलीसंगत । गीतें ओव्या गात गात । हात चाळा करितसे ।। ४४ ।। पाहतां पाहतां चाळणीतून । पीठ निघे झरझरुन । सर्व जाती आनंदून । आश्चर्य करितीं मनोमनीं ।। ४५ ।। आता मात्र जानकीवर । देवीचा राहे अभयकर । संसाराचा सर्व भार । चिंता शिरीं ती वाहतसे ।। ४६ ।। थोडे येता चांगले दिन । दादा आणती घडवून । सोन्याच्या पाटल्या म्हणून । जानकीकरीं घालावया ।। ४७ ।। तिच्या जीवनांत पहिली । ऐसी सुवर्णसंधी लाभली । ती सहज हांसून बोलली । कांकणदिन किती राहतील ।। ४८ ।। दादा जाती संतापून । म्हणे अभद्र बोले भाषण । परी वेळीच आले कळून । सस्मित हास्य पत्नीचें ।। ४९ ।। दरुवाड्यांत लाभले । प्रशस्त जागा असलेलें । घर कौलारु चांगले । पाटल्या विकून घेतले ।। ५० ।। जरी होतें तें प्रशस्त सुंदर । तरी न राहती सहोदर । कारण होता भुतांचा वावर । सभोंवतालीं घराच्या ।। ५१ ।। राजपूतांची होती वस्ती । ज्यांचे पूर्वज युद्धांत मरती । ते मृतात्मे तेथें वावरती । धिंगाणा करिती बहुत ।। ५२ ।। दादा जातीं रहावयाला । परी त्रास भुतांचा वाढला । आजार वेगळाची चालला । घरामाजी तयांच्या ।। ५३ ।। युद्धांत लुटली जी संपत्ती । ती घरांत पुरली होती । त्यावरीं सर्प भुजंगांची वस्ती । तेही वावरती घरांत ।। ५४ ।। ऐशा विविध तापांचा । त्रास दोघांना व्हायचा । धांवा करिती देवाचा । मनोमनी दोघेही ।। ५५ ।। परी दादांची निग्रही वृत्ती । त्रास अंगावर साहती । प्रसंग येतां जीवावरती । संतप्त जाहली जानकी ।। ५६ ।। महाकालिका संचारली । भुतें सर्व बांधिलीं । सीमा त्यांची रोखली । नदीपलिकडे त्वरीत ।। ५७ ।। सायंकाळी तेव्हापासुनी । घराचे पश्चिम दिशेंकरुनी । मागील अंगणं लक्षुनी । जानकी बैसे नित्याची ।। ५८ ।। करी धरुनियां उदबत्ती । लक्ष मात्र नदीवरती । नजर राहे शून्यावरती । ऐसें दिन-मास चालतसे ।। ५९ ।। मुलांना बसवी झोपाळ्यावरती । सांगे – म्हणावे शुभं करोती । स्वत: बसे देवापुढती । पश्चिम दिशेसी लक्षोनियां ।। ६० ।। ऐशीच एकदा लक्षुनी । उभी असतां ती अंगणीं । एक मनुष्य येई सदनीं । म्हणे भविष्य वर्तवितों चांगलें ।। ६१ ।। मुलीं त्याला घेऊनी येतीं । मागील दारीं आईपुढती । म्हणे भविष्य सांगावें निश्चिती । आईचे तू आम्हांला ।। ६२ ।। ज्योतीषी म्हणे द्यावा कर । आई बोट दाखवूनी समोर । म्हणे भविष्य वर्तवावे लौकर । याच व्यक्तीचे तुवां ।। ६३ ।। तेथें दृश्य होतें दिसत । भूतें असंख्य होती नाचत । किंचाळून होती कण्हत । घाम फुटलासे तयाला ।। ६४ ।। म्हणे आवर आवर माऊली । माझी मती येथे खुंटली । ऐसी बोबडी तयाची वळलीं । पळालासे तेथून ।। ६५ ।। मुली विचारती आईला । कायाले ज्योतिषाला । तेव्हां ती सांगे सकलां । इतिहास या भूतांचा ।। ६६ ।। ही युद्धभूमी होती पूर्वीची । तेथे कत्तल झाली सैन्याची । मुक्ति न मिळतां त्यांची । वस्ती येथें राहिली असे ।। ६७ ।। नित्य सायंकाळचे समयाला । हाक मारिती ती मजला । म्हणे मुक्ति द्यावी आम्हांला । शरण आलों तव पायीं ।। ६८ ।। ऐसे काहीं मास गेले । दिन आषाढाचे आले । नभीं मेघ पहा गर्जले । वर्षा झाली चोहीकडे ।। ६९ ।। वेंगणीया नदी आहे दूर । तिला आला भयंकर पूर । पाणी आलें घरा सभोवार । कित्येक दिवस राहिलें ।। ७० ।। असंख्य सर्प वळवळती । बाहेर पडाया वाटे भीती । दरुवाड्यातील स्त्रिया जमती । धांव घेती जानकीकडे ।।७१ ।। म्हणें काहीं उपाय करावा । पूर आता ओसरावा । जानकीचा करितीं धांवा । रक्ष-रक्ष गे म्हणोनी ।। ७२ ।। करीं तीर्थ देवाचें घेऊनी । म्हणे मजसवें सर्वांनी । चलावें या पाण्यांतुनी । सात पाऊले बरोबर ।। ७३ ।। परि सर्प पाण्यात वळवळती । पाऊल टाकण्या वाटे भीती । म्हणोनी जानकी निघे पुढती । तीर्थ पाण्यात ओतुनी ।। ७४ ।। म्हणे गंगे तूं होई शांत । आतां त्वरित व्हावें गुप्त । सर्व भुतें-प्रेतें होती मुक्त । तव कृपाप्रसादानें ।। ७५ ।। पाणी ओसरलें त्वरीत । सर्व सर्व झाले गुप्त । गांव सर्व आश्चर्य करीत । काय झाले म्हणोनियां ।। ७६ ।। तेव्हां जानकी तयांना सांगत । कीं गंगा आली प्रत्यक्षांत । भुतें परिसरांतील उद्धरीत । जे सर्परूपें वावरिती ।। ७७ ।। आतां तुम्हांस नाही भीती । सुखें करावी येथें वस्ती । पावन केली तुमची धरती । स्वयें गंगेनें प्रकटोनी ।। ७८ ।। लोकमात्र आश्चर्य करिती । कीं भगीरथाची झाली पुनरुक्ती । जय जानकी तुझी कीर्ति । आम्ही गाउं जन्मभरी ।। ७९ ।। कीर्ति हळूहळू पसरतां । स्त्रियां येती दर्शनाकरितां । जानकी प्रसाद देई भक्तां । संतोषवितें सर्वांना ।। ८० ।। कोणीही येतां सुवासिनी । तिची ओटी भरती श्रीफलांनी । नारळ लाभे कोनाड्यांतुनी । कळे न कैसा येई तो ।। ८१ ।। देवा जवळील कोनाड्यांत । वाटे कल्पतरु होता राहत । इच्छित वस्तु होती लाभत । जानकी मुखें वदतां ।। ८२ ।। एकदां दादा होते देवा वंदीत । तेव्हां लक्ष गेले कोनाड्यांत । तेथे श्रीफळ दिसतां कृद्ध । जाहले कीं जानकीवरी ।। ८३ ।। कशास गोळा करून । नारळ ठेवितां आणुन । मी देतों तया फेंकून । म्हणुनी उचलीला तो तयांनीं ।। ८४ ।। उचलोनी ठेवितां बाहेर । अणि परतोनि पाहतां सत्वर । दुसरा होता जागेवर । तोही काढला रागानें ।। ८५ ।। ऐसा ठेवितां ठेवितां काढुन । दुजा उत्पन्न होई तत्क्षण । ढीग नाराळांचा पाहून । आश्चर्य करिती थकोनियां ।। ८६ ।। तेव्हां जानकीस वंदून । म्हणती किती हे असतील जाण । म्हणे आम्ही सर्व मिळून । दैवतें जितकीं असूं येथें ।। ८७ ।। श्रीफळें पाहिलीं मोजुन । तीं हजार जाहली म्हणून । साष्टांग करिती नमन । क्षमा करावी म्हणोनियां ।। ८८ ।। यावरून श्रोतेजन । तुम्हां आले असेल कळून । की ‘दरिद्री नारायणी’ म्हणून । दुर्गा आलिसे भूवरि ।। ८९ ।। दारिद्र्याचें कराया निवारण । दु:खितांचे कष्ट कराया हरण । तेही सोसून पहाया जवळून । गरीब कुळी जन्मलीसे ।। ९० ।। दु:ख तयांचे पुसून । स्वत: दु:खाचे कढ पिऊन ।सुखवितसे जनांना ।। ९१ ।। ती नव्हती सुशिक्षित । परि सर्व भाषा होत्या अवगत । ओव्या असती नित्य मुखांत । गीतें वेगवेगळाली गातसे ।। ९२ ।। वर्णनें असती देवींचीं । त्यांच्या सुंदर भव्यपणाचीं । गानमुग्ध निश्चित ऐकणारे । होत असत तेधवा ।। ९३ ।। झोपाळ्यावर बैसे आपण । हर्षे ओव्या मुखें गाऊन । पाहणारा जाई चक्रावून । दृश्य तें पाहतां क्षणैक ।। ९४ ।। तेथें त्या न दिसे जननी । प्रत्यक्ष पाही ‘दुर्गा भवानी’ । नखशिखान्त सुंदरता पाहूनी । थक्क होई मनात ।। ९५ ।। सुंदर पर्या येती दिसुनी । झोकें घालतीं हातांनी । जानकी होई जगज्जननी । दृश्य होई मग अदृश्य ।। ९६ ।। ज्यांना घडलें ऐसें दर्शन । ते धन्य घेती म्हणवून । ते सर्व जाहले पावन । केवळ सान्निध्याने माऊलीच्या ।। ९७ ।। नवरात्रीचे येतां सुदिन । आणि असतां सुवासिनी पूजन ।मंजुळ स्वर येती कोठून । संगीताचे ऐकावया ।। ९८ ।। जवळ जवळ ते जैसे येती । वाटे गरबे कोणी खेळती । खोलीतच फेर धरती । इतकें स्पष्ट कळतसे ।। ९९ ।। जानकी करीतसे खूण । स्वस्थ बसावें म्हणून । तुम्ही घ्यावे पाहून । खेळ देवींचा चालला ।। १०० ।। देवता येऊन खेळती । कुंकवाची पदकमलें उमटती । घरी जानकीचीही करिती । मिळून सर्व आरती ।। १०१ ।। देवींचें संपता पूजन । सुवासिनी करिती वंदन । जानकी काढी ओटीतून । प्रसाद कुंकू उधळाया ।। १०२ ।। खडींसाखर देई काढून । त्यांची इच्छा करितसे पूर्ण । शिरीं कृपाकर ठेवून । आशिर्वाद देत असे भक्तांना ।। १०३ ।। जय जय जानकी जगज्जननी । आशिर्वाद लाभावा म्हणोनी । लीन जाहलो तव चरणीं । कृपा असावी भक्तांवरी ।। १०४ ।। प्रेमस्वरूप तूं प्रत्यक्ष । ध्यानीं न घ्यावा आमचा दोष । तुझा घडावा सहवास । सदैव आमुच्या जीवनीं ।। १०५ ।। जानकी दिसे दरिद्री नारायणी । परि प्रत्यक्षात ती भद्रकारिणी । वारंवार करिती विनवणी । नमो दैव्यै…! म्हणोनियां ।। १०६ ।। देवता येती पृथ्वीवर । जानकीसी वंदाया वारंवार । मग मी अल्प मति पामर । काय वर्णन करूं शके ।। १०७ ।। तरी ऐकावें श्रोतेजन । मनोभावें जावें शरण । जानकी कथेचें करितां श्रवण । फलद्रूप होती कामना ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम द्वितीयोऽध्याय: । श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

<< सावली – अध्याय १        सावली – अध्याय ३ >>

Click to rate this post!
[Total: 7 Average: 3.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *