मनोगत
कांही पूर्व पूण्य सुकृत पाठीशी होते म्हणुनच भक्तिचा वारसा मला माझ्या वाड-वडिलांचे कडून मिळाला. आमच्या घरांत, नवरात्र उत्सव दत्तजयंती उत्सव व गणपती उत्सव मोठ्या प्रमाणांत व भावभक्तिने होत असे. प्रत्येक उत्सवांत आरतीला बरीच मंडळी असत. आरती जवळ जवळ एकते दीड तास चालत असे. जणु आरत्यांची शर्यत लागत असे. त्यामुळे आमच्या कडून देवदेवतांच्या नविन नविन आरती संग्रह तयार होत असे.
पुढे पुढे संत संग देई सदा या तुकारामाच्या ओवीचा अनुभव येत गेला. मला बऱ्याच संतांची संगती मिळाली, त्यांत भर म्हणजे प. पू. भाऊकाकां सारखे गुरु मिळाले आणि भक्तीला बहर येऊन त्याचा सौरभ होऊन पसरतच गेला. गुरु आज्ञेने संत चरित्रे लिहिली. अनेक संतांच्या बावनी, शती, गीते, आरत्या लिलया लेखणीतून उतरत गेल्या. यांत माझा मोठे पणा कांहीच नव्हता.
“गुरु बोलले जे स्वमुखाने । लिहिले असे तेच मी लेखणीने असा हा सद्गुरु कुणाला दिसलाच नाही आणि मी फुकाचा श्रेयाचा धनी झालो. दत्तजयंती व गुरुपौर्णिमेला मी बहुतेक गुरुचरित्राचे पारायण करित असे. त्यावेळेला मला जेथे जातो तेथे तूं, माझा सांगाती हा अनुभव येत असे. अशा वेळी माझे मन आनंदाने गहिवरून येत असे. त्यातुनच दत्त चरित्रावर कांहीतरी लिहावे अशी ओढ मनाला लागत असे. या सर्व श्रेयाचे धनी गुरुमहाराज आहेत हे मी मनोमनी जाणतो, म्हणून मी आजन्म त्यांच्या ऋणांत राहु ईच्छितो. “गुरुकृपाही केवलम्” हीच माझ्या यशाची गुरु किल्ली आहे. अनन्य शरणांगती प्राप्त होताच “वायसाचा राजहंस होतो याचा प्रत्यय मला आला आहे.
संत चरित्राच्या लेखनातून व पदोपदी येणाऱ्या गुरुमहाराजांच्या अनुभवा वरून माझ्यातला ‘मी’ केंव्हाच विरुन गेला व केवळ ‘तूच’ सर्व कांही सर्वस्व असा निश्चय व दृढभांव माझ्या मनांत स्थीर झाला. “नको गुंतवू मोहात चरणी स्थीर व्हावे” अशी प्रार्थना मी श्री चरणी नित्याची करित असे.
“जिथे भक्तगण गाती भजने, तिथे च मजला सदैव असणे ।
प्रेम भक्तीने मज आकळणे, शरणांगत चरणा वरी ||
महाराजांच्या या वचनाची मनोमनी जाणिव होताच, गुरुचरित्रांतील लीलांवर आधारित गीते लिहीण्याची स्फुर्ती झाली. तेंच हे ‘गीत दत्तात्रेय’ होय. तेच सकल जन सुखाय, व्हावे हीच श्री चरणी विनम्र प्रार्थना..
माझ्या या सेवा कार्यत माझी पत्नी सौ. नंदा हिचा सिंहाचा वाटा आहे. ह्या कार्यात मी सुमन असलो तरी ती सुगंध आहे. सेवा कार्यात तिची भूमिका तुलसी वृंदावना सारखी आहे. आमची मुल, सुना, नातवंड ह्या आमुच्या मंजी-या आहेत, आणि म्हणुनच आम्ही ‘सहकुटुंब सहपरिवार’ दास आम्ही हे घरदार होऊ शकलो, हे नि:संशय.
“ऋणानु बंधाच्या जुळून येती गाठी । भेटीत तृप्तता मोठी ।।”
जीवनाच्या प्रवाहांत आपलेपणाचा ओलावा असरणाऱ्या व्यक्ती, अगांतुकपणे भेटतात व सुगंध पसरून जाता. मला वाटते की ही ईश्वराची अतर्क्य लिला आहे. सौ. विजयाताई कट्टी व श्री श्रीकांत शृंगारपुरे त्यापैकीचे एक आहेत. माझ्या विषयी त्यांना वाटणाऱ्या निरपेक्ष प्रेमयुक्त आदर भावनांतून त्यांनी प्रस्तावना लिहून दिल्या त्या बद्दल मी त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे. सदरहू
धन्यवाद
मधुकर गजानन सुळे मो. 9925185063
॥ त्वं सर्वस्वं मम तात माय ॥
कै. श्री. गजानन बळवंत सुळे
कै सौ. सरस्वती गजानन सुळे
शिवलीलांमृताच्या मायेची पाखर जिने माझ्या अंगावर घातली व दत्तभक्तीचे बीज ज्यांनी माझ्या मनांत रूजवल, त्या माझ्या ‘आईवडीलांना ” हे गीत दत्तात्रेया” चे श्रेय पूष्प मी श्रद्धेय अंतःकरणाने समर्पित करीत आहे.
विनम्र
मधुकर गजानन सुळे