शाङ्गरव म्हणाला , “ ही विवाहित स्त्री तुझीच पत्नी आहे आणि ती गर्भवती आहे. तिचा तू स्विकार कर अथवा त्याग कर , आमचे कर्तव्य संपले . आम्ही चलतो .” असे म्हणुन शाङ्गरव, गौतमी व तपस्वी वगैरे मंडळी अति कष्टाने निघून गेली. त्यावेळी शकुंतलेची अत्यंत करुणामय अवस्था झाली. राजाकडे थारा नाही, कण्वबाबांचेकडे परत जाण्यास तोंड नाही . ती एक एक आठवणी अत्यंत काकुळतीने राजाला सांगु लागली . ती म्हणाली ,” मृगये कारण वनांत येऊनि ,आश्रमात शिरला “
शकुंतला : मृगये कारण वनांत येऊनि , आश्रमात शिरला
नेत्र कटाक्षे प्रीति संगम , इथेच हा घडला II धृ II
लता मंडपी एकांती या बघुनि राधिकेला
कृष्णापरि कर घेऊनि माझा अधर चुंबियेला
‘राजमुद्रिका ‘ अर्पुनि वदला , नच अंतरि तुजला II १ II
द्रोणांतुन जल देता , हरिण तिथे आला
जल प्राशन तव करी न करता मम करी प्राशियला
“सजातीय तुम्ही वनचर दोघे “ तू चेष्टे वदला II २ II
हाय हाय परि दुर्दैवाने घात पुरा केला
मधुवचनावर फसता ठरले जारिणी मी अबला
प्रमत्त होऊनी कलंकिशी कां निष्कलंक बाला II ३ II
नव कुसुमांचे भ्रमर प्राशितो , मधुर मधु एकला
नव युवतींचे यौवन भृंगा ,प्राशुनी जगी मातला
वचन बोल नच स्मरशी देऊनि दांभिक नृप शोभला II ४ II
नेत्र कटाक्षे प्रीति संगम ——–